महाराष्ट्र

पालखी सोहळ्याला गालबोट?

इंद्रायणीच्या काठावर हजारो वारकरी दाखल झाले आहेत. याच वारकऱ्यांच्या टाळ मृदुंगाच्या गजरात आज पालखी प्रस्थान सोहळा पार पडणार आहे. सकाळपासून या पालखी सोहळ्यासाठी लगबग सुरु आहे. पालखी प्रस्थानादरम्यान मानाच्या पालख्यांनाच फक्त प्रवेश दिला जातो. याच मानाच्या दिंंड्या मंदिराच्या जवळ असतात. मात्र ऐनवेळी या दिंंडीतील मोजक्या लोकांना मंदिराच्या आत प्रवेश देण्यात आला. त्यामुळे दिडींतील इतर वारकरी नाराज झाले. ते मंदिरात जाण्यासाठी गर्दी करत होते. याचवेळी पोलिसांमध्ये आणि दिंडीतील वारकऱ्यांमध्ये वाद झाला.

पोलिसांकडून वारकऱ्यांवर लाठीचार्ज…
या पालखी सोहळ्यासाठी शेकडो पोलीस तैनात करण्यात आले आहेत. वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि सुरक्षेसाठी पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे. हा वाद पोलीस आणि वारकऱ्यांमध्येच झाल्याने पोलिसांचं नियोजन चुकल्याचं बोललं जात आहे. त्यासोबतच पोलिसांनी वारकऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज केल्यामुळे वारकऱ्यांकडून नाराजीचा सूर आहे.

वादानंतर पोलीस बंदोबस्तात वाढ…

हा वाद सुरु असताना अनेक वारकरी जमले होते. वारकऱ्यांवर पोलिसांनी काही प्रमाणात लाठीचार्ज केला. काही वेळाने हा वाद मिटला मात्र ज्ञानेश्वर मंदिरासमोर आता पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि वारीला गालबोट लागू नये, यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहे. काही प्रमाणात तणावाचं वातावरण निर्माण झालं मात्र परिस्थिती आता नियंत्रणात आणण्याचा वारकरी आणि पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहे.

वारकऱ्यांना विठुरायाची आस…
वारकऱ्यांच्या टाळ मृदुंगाच्या गजरात आज पालखी प्रस्थान सोहळा पार पडणार आहे. तर पायी प्रवास करुन 28 जूनला पालखी पंढरपूरमध्ये (Pandharpur) पोहोचेल आणि 29 जूनला संत ज्ञानेश्वर माऊलींची विठुरायांशी भेट घडेल. वारकरी संप्रदायाला याच क्षणाची आस लागलेली असते. वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या पालखी सोहळ्याची हजारो विठ्ठल भक्त प्रतिक्षा करत असतात. हजारो वारकऱ्यांना आता विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्याची आस लागली आहे.

Related posts