महाराष्ट्र

नोकर भरतीस स्थगिती न दिल्यास मंत्रालयात आत्मदहन करण्याचा छावाचे योगेश पवार यांचा ईशारा

सोलापूर -: सुप्रीम कोर्टातील एस.ई.बी.सी. आरक्षणाची अंतिम सुनावणी होवून निकाल लागेपर्यंत महाराष्ट्रातील नोकर भरतीस स्थगिती द्यावी अन्यथा दि. 27 सप्टेंबर 2020 रोजी मंत्रालयात आत्मदहन करण्याचा ईशारा छावाचे योगेश पवार यांनी दिला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की., मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी चालू असून या याचिकांवर सुनावणी करताना एस.ई.बी.सी. अंतर्गत देण्यात आलेल्या सन 2020-21 या वर्षातील शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया व नोकरी भरतीस सुप्रीम कोर्टाने 09 सप्टेंबर 2020 रोजी अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे मराठा युवक हा हवालदिल होवून निराश झालेला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या आदेशामुळे मराठा युवकांचे व उमेदवारांचे खुप मोठे आर्थिक, मानसिक नुकसान झालेले आहे.
त्यामुळे मराठा युवकांना मनोधैर्य वाढविण्यासाठी व त्यांचे सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासनाने तातडीने पाऊले उचलावीत. तसेच येत्या काळात महाराष्ट्रात होणाऱ्या सर्वच विभागातील व सर्वच पदांच्या नोकर भरतीस तातडीने स्थगिती द्यावी आणि परीक्षा होवून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देवु नयेत. तसेच सुप्रीम कोर्टातील मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत महावितरण, महसूल व वन विभाग, आरोग्य खाते, गृह खाते, ग्रामविकास खाते, कृषी खाते, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरविकास खाते, जलसंपदा व जलसंधारण खाते, पशुसंवर्धन व मत्स्य खाते यांसह सर्वच विभागातील नोकर भरती स्थगित करण्याची मागणी छावाचे योगेश पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचेकडे ईमेलव्दारे केली आहे.
तसेच शासनाने येत्या सात दिवसांत महावितरण विभागातील, महसूल विभागातील तलाठी पदे व अन्य विभागातील पदांच्या उमेदवार नियुक्तीस व नोकर भरतीस स्थगिती न दिल्यास दि. 27 सप्टेंबर 2020 रोजी मंत्रालयात आत्मदहन करण्याचा ईशारा योगेश पवार यांनी दिला आहे.

Related posts