महाराष्ट्र

सत्ता येत अन् जाते, पण…’, मलिकांना महायुतीत घ्यायला भाजपचा विरोध,

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी बाकावर सर्वात शेवटी बसले, यावरून नवाब मलिक यांचा महायुतीला पाठिंबा असल्याचं स्पष्ट झालं आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली, यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट अजित पवारांना पत्र लिहिलं आहे, तसंच मलिकांना महायुतीत घ्यायला विरोध असल्याचं फडणवीस यांनी या पत्रात स्पष्ट म्हणलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर अजितदादांना लिहिलेलं हे पत्र शेअर केलं आहे.
नवाब मलिकांवरून हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खडाजंगी पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी बाकावर सर्वात शेवटी बसल्याने त्यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याचं स्पष्ट झालं. मात्र यावरून आता विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत विधान परिषधेत जोरदार टीका केली. ज्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप आहेत त्यांच्यासोबत आम्ही कधीही बसणार नाहीत, असं सत्ताधारी पक्ष तेव्हा सांगत होता, मात्र आता त्यांना सोबत का घेऊन बसला आहात? असा सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केला.

फडणवीसांचं पत्र जसंच्या तसं

माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य श्री.नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते, विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकारसुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रूता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो.
परंतू, ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नाही, असं आमचं मत आहे.
सत्ता येते आणि जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे, मात्र अशाप्रकारच आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणं हे योग्य होणार नाही. असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कुणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे. हे मान्यच आहे, परंतू, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटकपक्षाला करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे.
त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकासआघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही, आपण आमच्या भावनांशी नोंद घ्याल, अशी मला आशा आहे.

Related posts