महाराष्ट्र

बुलढाण्यात प्रवासी बसचा भीषण अपघातात 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू

बुलढाण्यात एका प्रवासी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते. यातील आठ प्रवासी सुखरुप बाहेर पडले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर हा अपघात झाला आहे. ही प्रवासी बस नागपूरहून पुण्याला निघाली होती. त्यावेळी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली.

अपघातग्रस्त बस ही नागपूरहून पुण्याकडे जात होती. त्यावळेळी हा अपघात घडला. या बसमध्ये नागपूर, वर्धा, आणि यवतमाळचे प्रवासी होते. ही बस विदर्भ ट्रॅव्हल्सची होती. ही बस सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर रस्ता दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर बसने पेट घेतला. डिझेलच्या संपर्कात आल्याने बसने वेगाने पेट घेतला. त्यानंतर बसमध्ये असणाऱ्या 33 प्रवाशांपैकी आठ प्रवासी सुखरुप बाहेर पडले. तर 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुखरुप बाहेर पडलेल्यांमध्ये चालक आणि वाहकाचा समावेश आहे. दरम्यान, जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं आहे. यातील बहुतांश प्रवाशी हे नागपूर, वर्धा आणि यवतमाळचे आहेत.

बुलढाणा जिल्ह्यात खासगी बसच्या अपघातात 25 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारच्या वतीनं पाच लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. एबीपी माझाशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी याबाबतची माहिती दिली.

बसचा दरवाजा गाडीखाली आल्यानं कोणालाच बाहेर येता आलं नाही
बस पहिल्यांदा लोखंडी पोलला धडकली. त्यानंतर ही बस रस्ता दुभाजकाला धडकली. त्यानंतर बस पलटी झाली. बसचा दरवाजा गाडीखाली आल्यानं कोणालाच बाहेर येता आलं नाही. वाचलेले प्रवासी गाडीच्या काचा फोडून बाहेर आले. पोलीस आणि घटनास्थळी असलेल्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, बस सर्वात आधी नागपूरवरून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर उजवीकडे एका लोखंडी पोलला धडकली. अनियंत्रित होऊन पुढे जाऊन येणाऱ्या आणि जाणाऱ्या दोन्ही लेनच्या मध्ये असलेल्या काँक्रीटच्या दुभाजकाला धडकली आणि पलटली. बस पलटी होताना डाव्या बाजूने पलटली. त्यामुळं बसचे दार खाली दाबले गेले. त्यामुळं लोकांना बाहेर पडण्यासाठी मार्ग नव्हता.
मृतदेहांची ओळख पटवणे अडचणीचे
अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर बसमधील डिझेल सांडले आहे. त्यामुळं एक तर डिझेल टॅंक फुटली असावी किंवा डिझेल टॅंक मधून इंजनकडे सप्लाय होणारा पाईप फुटला असावा, त्यामुळेचं बसने पेट घेतला असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. जे लोक बचावले आहे त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जे लोक काचेची खिडकी हाताने फोडून बाहेर निघू शकले त्यांचा जीव वाचला आहे. बसमधून 25 मृतदेह पोलिसांनी बाहेर काढले आहेत. जे मृतदेह बसमधून बाहेर काढण्यात आले आहेत, त्यांची ओळख पटवणे अडचणीचे होत आहे.

Related posts