महाराष्ट्र

आम्ही सर्व महापालिका स्वबळावर लढवणार”

“मुंबईसह नागपूरपर्यंत आम्ही महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहोत. मग काय होईल ते होईल? एकदा आम्हाला आमची ताकद आजमावायचीच आहे. आम्ही महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहोत. नागपूरला सुद्धा आम्ही स्वबळावर लढणार आहोत. आम्हाला उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील संकेत दिलेले आहेत. आमचा असा निर्णय होत आहे की मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर असेल. कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? कारण आघाडीत आणि विधानसभेत कार्यकर्त्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाला आणि पक्षाच्या वाढीला बसतो. महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपंचायतीमध्ये निवडणुका स्वबळावर लढून आपआपले पक्ष मजबूत करावे लागतात”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला आलेल्या अपयशानंतर आता महाविकास आघाडीत खटके उडायला सुरुवात झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून आघाडीतील तिनही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. यातच पुढील काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आतापासून सुरुवात केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाची महत्वाची बैठक उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी घेतली होती. या बैठकीत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या.तसेच महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे संकेत काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी दिले होते. त्यानंतर आज (११ जानेवारी) खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना मोठी घोषणा केली आहे. “मुंबईपासून ते नागपूरपर्यंत सर्व महापालिकेच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढवणार आहोत”, अशी घोषणाच संजय राऊत यांनी केली. त्यांच्या या घोषणेमुळे महाविकास आघाडीतील नेत्यांकडून आता प्रतिक्रिया येत आहेत. तसेच ठाकरे गटाच्या या घोषणेमुळे महाविकास आघाडीत फूट पडली आहे का? याबाबत आता चर्चा रंगल्या आहेत.

Related posts