मुंबई : पुढारी ऑनलाईन
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १ मे पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. दरम्यान, भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर हल्लाबोल केला आहे. ठाकरे सरकारचा भ्रष्टाचार हा एककलमी धंदा आहे, असा गंभीर आरोप राणे यांनी केला आहे.
राणे पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यास ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे. बाजारपेठांमधील गर्दीचा विचार सरकारने करायला हवा. संचारबंदीचा परिणाम होताना काहीच दिसत नाही. लॉकाडाऊनच्या भीतीने नागरिक बाजारपेठेत गर्दी करत आहेत. त्यामुळे बाजारपेठांमधील गर्दीचा विचार सरकारने करायला हवा, असे राणे म्हणाले.
तसेच, रिक्षाचालकांना दीड हजाराची मदत दिली. त्यातून पूर्ण कुटुंबाचं पालनपोषण होणार का? ५ जणांच्या कुटुंबाचं महिना दीड हजारात कस भागवणार? असा संतप्त सवाल राणे यांनी ठाकरे सरकारला केला. व्यवसाय बंद असताना जीएसटी का सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित करत लॉकडाऊन उठवा दुकाने सुरू करा, गोरगरिबांचा विचार करा असे आवाहन राणे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
ठाकरे सरकारवर निशाणा साधत राणे म्हणाले, की अर्थसंकल्पात केवळ विकासाला पैसा दिलेला नाही. अर्थमंत्री फक्त आकडेवारी सादर करत आहेत. कोरोना हाताळण्यााठी मुख्यमंत्र्यांकडे बुद्धिमत्ता योग्य मार्गदर्शक नाही. यासोबतच प्रत्येकवेळी केंद्राकडे मदत का मागत असता? असा सवाल उपस्थित करत जे नाही त्यांची यादी वाचण्यापेक्षा ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करा, असा टोला त्यांनी लगावला आहे.
दिवाळखोरीच सरकार जनतेला वाचवू शकत नाही. जनाची नाही केवळ मनाची बाळगा. मुख्यमंत्री फक्त बाधित आणि मृतांची संख्या जाहीर करतात. त्यामुळे हे ठाकरे सरकारचा भ्रष्टाचार हा एककलमी धंदा असल्याचे राणे यांनी म्हटले आहे.
