राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी ठरला. इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षण कायम राहण्याकरिता केंद्राकडून सांख्यिकी माहिती मिळावी, यासाठी विधानसभेत मांडण्यात आलेल्या ठरावावेळी प्रचंड गदारोळ झाला. त्यानंतर अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं. या कारवाईचे पडसाद आज विधानसभेत आणि सभागृहाबाहेर पडसाद उमटले. भाजपाने आक्रमक भूमिका घेत राज्यात विविध ठिकाणी तसेच विधिमंडळाबाहेर आंदोलन सुरू केलं. त्याचबरोबर विधिमंडळ परिसरात प्रतिविधानसभा भरवण्यात आली. या प्रतिविधानसभेत सरकारविरोधात धिक्कार प्रस्ताव मांडण्यात आला.
