सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे शुक्रवारपासून (दि. 21) ग्रामीण भागात कडक लॉकडाऊन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केला आहे. येत्या 21 मे ते 1 जूनअखेर या कालावधीत ग्रामीण भागात भाजी बाजार, किराणा दुकानांसह सर्वच अत्यावश्यक सेवा बंद राहणार आहेत.
फक्त वृत्तपत्र विक्री, औषध दुकाने व हॉस्पिटल सुरू राहणार आहेत. भाजीपाला, दूध व किराणा घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळतील त्या भागाला गेल्यावर्षीप्रमाणे आता कंटेनमेंट झोन करीत प्रवेशबंदी केली जाणार आहे. यादृष्टीने पोलिस, आरोग्य व प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. त्यासाठी पोलिस प्रशासन आणि ग्रामस्तरीय समित्यांना अलर्ट करण्यात आले आहे.
गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला आहे. दररोज सरासरी 50 वर मृत्यू आणि दोन-अडीच हजार रुग्ण सापडत होते. यामध्ये शहरातील प्रमाण कमी आणि ग्रामीण भागात प्रमाण अधिक दिसून आले आहे. एकूणच खबरदारीच्या उपाययोजनांचा अभाव असल्याने हे प्रमाण वाढले आहे. यामुळे शंभरकर यांनी ग्रामीण भागात कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी आजपासून 1 जूनदरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यातील ग्रामीण भागात कडक लॉकडाऊन राहणार आहे.
ग्रामसमित्यांना करणार अलर्ट
अशापरिस्थितीत कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी पूर्वीप्रमाणे पुन्हा एकदा गावात कंटेनमेंट झोन करून त्याठिकाणी आढळून येणार्या बांधितांची आणि संशयितांची तपासणी केली जाणार आहे. ग्रामीण भागात सौम्य लक्षणे असणार्या रुग्णांची संख्या अधिक असल्याची शंका उपस्थित होत आहे. त्यांना शोधून योग्य उपचार देण्यासाठी आता ग्रामीण भागात ग्रामस्तरीय समित्यांना अलर्ट करण्यात येत आहे.
त्या गावात कडक बंदोबस्त
ज्या गावात रुग्णांची संख्या अधिक आहे त्याठिकाणी जर लोक ऐकत नसतील तर त्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकाने, भाजीपाला, दूध, आरोग्यसुविधासह प्रशासनाने मान्य केलेल्या काही सेवांना घरपोच देण्याची सूट राहणार आहे. यासाठी स्थानिक पोलिसांकडून पास देण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील सौम्य लक्षणे असणारे रुग्ण स्वत:हून पुढे येत नसल्याने आता त्यांची शोधमोहीम होणार आहे. एखाद्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यास त्याच्या आजूबाजूचे अथवा संपर्कात असणारे लोक तपासणीसाठी स्वत:हून पुढे येत नाहीत. त्यामुळे त्या भागाला कंटेनमेंट झोन करून तेथे तपासणीसाठी सक्ती राहणार आहे.
