पंढरपूर

स्वेरीचा बेंगलोरच्या ‘सोबस इन्साईटस् फोरम’ सोबत सामंजस्य करार.

पंढरपूर:

गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचा बेंगलोर मधील ‘सोबस इन्साईटस् फोरम’ सोबत नुकताच सामंजस्य करार झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.

हा सामंजस्य करार स्वेरीतील विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापकांना उद्योजकता या क्षेत्रातील कौशल्य वाढीसाठी उपयुक्त ठरणार आहे. स्वेरीतील प्राध्यापकांचा संशोधनातील अनुभव विचारात घेवून व ग्रामीण भागाच्या विकासासाठी स्वेरी करत असलेले कार्य पाहून या कंपनीने स्वेरी सोबत सामंजस्य करार केला आहे.या सामंजस्य करारावर ‘सोबस इन्साईटस् फोरम’ तर्फे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिग्विजय चौधरी व महाविद्यालयातर्फे स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी स्वाक्षऱ्या केल्या. सोबस इन्साईटस् फोरमबरोबर झालेल्या सामंजस्य करारामुळे पंढरपूर आणि आसपासच्या ग्रामीण भागात उद्योजकता वाढीस चालना मिळणार आहे.

यावेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिग्विजय चौधरी म्हणाले की, ‘ग्रामीण भागामध्ये बुद्धिमत्तेची कमतरता नसते तर केवळ प्रोत्साहन आणि आत्मविश्वासाची गरज असते. फार पूर्वीपासून मी स्वेरीची वाटचाल पाहत आलेलो आहे. स्वेरी मध्ये ‘इच्छा/उद्देश’ आहे आणि ‘क्षमता’ ही आहे. ग्रामीण भागाच्या विकासाची एक उर्मी ही स्वेरीमध्ये आहे. त्यामुळे या कराराच्या माध्यमातून ग्रामीण भारताच्या विकासास नक्कीच हातभार लागणार आहे.’ या करारामुळे स्वेरीतील विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक आणि सोबस इन्साईटस् फोरम मधील सर्वांना मिळून एक चांगली संधी प्राप्त झाली आहे. सोबस इन्साईटस् फोरम सोबत स्वेरीमधील प्राध्यापक व संशोधक यांची उद्योजकता विकासाबाबत देवाण घेवाण होणार आहे. तसेच या करारानुसार स्वेरीमध्ये ‘सेंटर ऑफ एक्सलंस’ ची स्थापना करण्यात येणार आहे. पूर्वी स्वेरीचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील इतर ३१ कंपन्यांबरोबर सामंजस्य करार स्थापित झालेले आहेत. अशा करारामुळे स्वेरीमध्ये शिक्षणाबरोबरच, संशोधन आणि उद्योजकता विकासाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण मिळावे या हेतूने १९९८ साली अभियांत्रिकी महाविद्यालयाची सुरवात झाली. तेथून पुढे विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देणे एवढ्यावरच न थांबता त्यांचा कल संशोधनाकडे कसा वळविला जाईल हे पाहून त्या दृष्टीने संस्थेने पाऊले उचलली आहेत.आता स्वेरी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ग्रामीण भागाचा विकास कसा करता येईल यावर भर देत आहे. याच कारणामुळे आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांबरोबरच शहरी व परराज्यातील विद्यार्थी देखील स्वेरीकडे शिक्षणासाठी वळत आहेत.भारत सरकारच्या भाभा अणूसंशोधन केंद्रासह इतर अनेक संस्थाबरोबर झालेल्या करारामुळे आजमितीस संशोधनासाठी रु. सात कोटी पेक्षा जास्त निधी उपलब्ध झाला आहे. स्वेरीचे विद्यार्थी कॅम्पस प्लेसमेंट आणि विद्यापीठात सर्वोच्च निकाल मिळविण्याबरोबरच संशोधनाकडे वळत आहेत ही सोलापूर जिल्ह्यालाच नव्हे तर महाराष्ट्रालादेखील गौरवाची बाब आहे. हा करार पूर्ण होण्यासाठी शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन अधिष्ठाता डॉ. संतोष साळुंखे यांनी परिश्रम घेतले.

यावेळी सोबसचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिग्विजय चौधरी, संस्थेचे विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी. मिसाळ, सोबसचे गिरीष संपत, उमाकांत नाडकर, आकांक्षा सिन्हा, गौतम सेल्वराज आदी उपस्थित होते. या करारामुळे संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले यांच्यासह पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी कॅम्पसचे इनचार्ज, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांनी अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष साळुंखे यांनी केले तर डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन. डी. मिसाळ यांनी आभार मानले.

Related posts