Blog

धरतीचे दान…

भर उन्हामध्ये आपल्याच तळपण्याने अंगाची लाही लाही करून घेणारा सूर्य… त्याच्या या प्रखर किरणांची तप्त ज्वाला आपल्या कुशीत सामावून घेणारी ही धरतीची माती… भरदुपारी आपल्यामध्ये अत्यंत शांतपणे ती सूर्याची किरणे निमुटपणे त्यांची गरमी सोसत होती… या धरतीच्या मातीचा सृजनतेशी अगदी जवळचा संबंध असल्यामुळे ही या कसोटीतून तर जात नाही ना\ असा प्रश्न सतत मनाला भेडसावत होता… जस जसा प्रहर ओसरत होता तसतशी ती या सूर्याच्या किरणामधून न्हाऊन निघत आहे असाच भास मला व्हायचा… मग अगदी अल्लंड वाऱ्याची झुळूक येऊन मातीच्या सानिध्यातून तरंगत पुढे जायची ती आपल्या सोबत त्या मातीचा मनाला भुरळ पाडणारा सुगंध सोबत न्यायची… तो सुवास संबंध वातावरणात पसरलेला भासायचा… त्याचा सुगंध मनाला एक वेगळया तऱ्हेची जाणीव निर्माण करूण द्यायचा… दूर दूर पसरलेला सुवास अगदी आसमंतात आपल्या अस्तित्वाची प्रेरक उत्कंठता निर्माण करायचा… कदाचित तो संबंध वातावरणाला सृजनतेची अबाधित वेळ जवळ येत आहे याचाच संदेश देत आहे असे वाटायला लागले…
शेतकरी राजानेही आपली संपूर्ण मेहनत झोकून देत तिला नव्या नवरीप्रमाणे सजवून ठेवले होते… तो ही आता आपल्या मनामध्ये स्वप्न रंगवत होता… ज्या दिवसाची संबंध सृष्टी अगदी आतुरतेने वाट पाहत होती, तो दिवस उजाळला… आणि मृगनक्षञास सुरुवात झाली… धरतीवर पावसाच्या सरी धो..धो कोसळल्या… मातीच्या प्रत्येक कणन् कणात मिलनाचे तांडव नृत्य सुरू झाले होते… अन् त्या मातीचा मनाला भारावून सोडणारा सुगंध पुन्हा त्या पाऊसधारा आकाशात पोहचवत होत्या… पावसाने धरतीच्या मातीमध्ये असलेली सगळी उष्णता आपल्या शीतल सरींनी शांत केली प्रत्येकाच्या चेह-यावर अगदी आनंदाची लहर पसरली… कित्येक दिवसापासून ताहानल्याने व्याकूळ झालेली झाडे त्यांच्यात नवचैतन्याची चाहूल लागायला सुरुवात झाली… पक्ष्यांनी आनंद उत्सव साजरा करावा तशाप्रकारे त्यांच्या किलबिलाटातून जाणवत होते…
सर्वञ आनंदमय वातावरण निर्माण झाले होते… प्रत्येकाच्या चेह-यावर आनंद खुलून दिसत होता… शेतक-यांनी धरतीच्या कुशीमध्ये मोत्याच्या दान्यांची रास तिला बहाल केली आणि मग सुरुवात झाली नव्या लयबध्दं सृजनतेच्या प्रक्रियेला… तिच्या कुशीमधून अंकुर फुलू लागले… पावसानेही आपल्या मनमुराद पाऊस धारेच्या सरी तिच्यावर बरसावत धरतीला आपल्या अस्तित्वाची जाणीव तो करूण देत होता… त्याच्या क्षेञछायेमध्ये ते रूजलेले, अंकुरलेले बीज मोठे मोठे होत होते… आता त्या बीजांचे लहान लहान रोपांमध्ये रूपांतर झाले होते… आणि ते वा-याच्या तालावर डुलत होते… पक्षीही त्याच्या भोवती गिरटया घालायचे ते वाट पाहत होते त्याच्या परिपूर्णतेची… हळू हळू ही निसर्गदत्त प्रकिया पूर्ण होत होती… सर्वत्र धरतीने हिरवा शालू पांघरलेला आहे असेच तिच्याकडे पाहिल्यावर जाणवत होते… आता ते रोप मोठी झाले होती… त्यांच्यामध्ये आता भारदस्तपणा आला होता… त्यांची वाढ आता पूर्ण होत होती… पक्ष्यांचा थवा त्यांच्याकडे आकर्षित होत होता… त्यांच्यामधील दाने टिपण्याकरिता ते सतत आसुसलेले असायचे… येथे कसरत चालायची शेतक-याची आपल्या शेतातील आलेले हे मोत्याचे पीक वाचवण्यांसाठी… कारण पक्षी टपलेले राहायचे… मग शेतामध्ये उभ कराव लागायचे ते बुजगावण त्या पक्ष्यांना हुलकावणी देण्यासाठी…
पक्षी बुजगावण्याला पाहून आकाशातच घिरटया मारायचे… आणि घाबरायचे त्याला, एक अनामिक भिती त्यांना वाटायची त्याच्याकडे पाहिल्यावर… तो दिसायचाही तसाच भीती वाटण्याजोगा… मग पक्ष्यांचे थवे आपला काफिला वळवायचे दुसरीकडे… पण प्रत्येक ठिकाणी त्यांना जाणवायचा बुजगावण्याचा सारखेपणा… त्यामुळे त्यांच्याही लक्षात यायचे की, हे फक्त आपल्याला हुलकावणी देण्यासाठी उभे केलेले पुतळे आहे… मग ते ही न घाबरता बिलगायचे त्या मोठया झालेल्या परिपक्व रोपटयांना… आणि आपल्या मर्जीप्रमाणे आपल्या चिमुकल्या चोचीने ते दाने टिपायचे… हे सर्व चालायचे जो पर्यंत कोणी त्यांना हुलकावणी देत नाही तोपर्यंत… काही चोचीतून पडलेले दाने असायचे खाली पडलेले जमीनीवर… तेही पूर्णपणे नाही तर काही प्रमाणात पक्व झालेले रूचकर अशा दाण्यांची चव त्या पाखरांना लागली होती… त्यामुळे ती पाखरं सतत दिवस उजाळताच आपल्या सवंगडयासह यायचे दररोज त्या ठरलेल्या शेतावर… येथे शेतक-याचीही तारांबळ उडायची आणि तो राखण करायचा आपल्या शेताची… तो डोळयात तेल घालून लक्ष ठेवायचा त्या पक्ष्यांच्या थव्यावर… अन् उडवायचा गोफन… त्या पक्ष्यांच्या थव्याला ऊडवायला… आता पक्ष्यांचेही चालायचे नाही त्याच्यापुढे काही… कारण कित्येक पक्षी जायबंदी झाले होते त्या गोफनीच्या दगडांने… काहींना तर आपला प्राण सुध्दा गमवावा लागला होता… त्यामुळेच त्यांच्या मनामध्ये एक अनामिक भिती निर्माण झाली होती त्या गोफनीबद्धल…
आता त्यांची हिंमत होत नव्होती त्या शेतावर उतरण्यांची आणि दाणे टिपण्यांची… कारण आपल्या पिकावर राखण आता बुजगावने नाही तर शेतकरी स्वतं:च करत असे… ही प्रक्रिया चालायची काही काळ… आणि पीक अशा तऱ्हेने संपूर्णपणे परिपक्व व्हायचे… आता ते पीक कापणीवर आले होते… ते सर्व पीक कापल्यावर त्या पिकाचे, कणसाचे, लागलेल्या झोताची मळणी झाल्यावर समोर दाण्यांची डोळयात न मावणारी मोत्याची रास समोर दिसायची… अगदी मोजकी दाण्यांची रास धरतीच्या कुशीत रूजवली होती… आता तेच दाने किती तरी पटीने आपल्या समोर दिसत आहेत… म्हणजे सृष्टीत चाललेली सर्व प्रक्रिया, पक्ष्यांनी खाल्लेले दाणे सोडले तरीसुध्दा मोठया प्रमाणात या धरतीने आपल्याला दान दिले… आणि संपूर्ण मानव जातीचे जीवन समृध्द केले… सृजनाचा नवलगतीने चालणारा हा अविष्कार जो याचा भागीदार असतो तोच खराखुरा भाग्यवंत असतो… प्रत्येकालाच नाही मिळत हे धरतीचे दान…

बबलू कराळे (स. शिक्षक)
अवधूत नगर ” जान्हवी निवास ” दर्यापूर
जिल्हा : अमरावती मो. 7218029838

Related posts